पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते शाहिद खेरटकर यांचा पुरस्काराने सन्मान
सांगली : कामेश्वरी साहित्य मंडळ कामेरी (सांगली)आयोजित हौसाई मातृस्मृती साहित्य संमेलन तसेच हौसाई मातृस्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा ईश्वरपूर)च्या संयुक्त विद्यमाने राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनी सभागृहात ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा.पाटील (कामेरी) हे आपल्या आईच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी सदरचे साहित्य संमेलन व साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करत असतात.या वर्षी हे चौथे पर्व पार पडले. मराठी कादंबरी,कविता,कथासंग्रह, ललित लेखन,चरित्र लेखन अशा विविध प्रकारातील साहित्यकृतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याप्रसंगी शाहीर शाहिद खेरटकर यांच्या “ललकारी”या कवितासंग्रहाला “शीघ्रकवी तमाशा सम्राट शाहीर नायकु जाधव स्मृती पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळ्याला अध्यक्ष- विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष श्यामराव पाटील(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ सदस्य), उद्घाटक – महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत पाटील तसेच ॲड.बी.एस पाटील (साहित्यिक,चित्रकार) ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहीर शाहिद खेरटकर यांचा “ललकारी” हा कवितासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला आहे कारण त्यातील कविता सामाजिक वास्तव रेखाटतात, समतावादी आणि मानवतावादी मूल्यांची पेरणी करतात. मूलतः शाहीर असणारे शाहिद खेरटकर यांच्या कवितेतील शब्दांचे फटकारे वाचकांच्या मनाला स्पर्श करून जातात. कविता म्हणजे केवळ शब्दांची गुंफण नव्हे तर ती एक सामाजिक प्रतिबिंब घेऊन अवतरते, व्यवस्थेवर प्रहार करते, परिवर्तनाच्या वाटेवर मार्गदर्शक बनते आणि म्हणूनच ती रंजक नव्हे तर प्रबोधनाचा धागा बनते. याच धाटणीच्या कवितांचा शाहिरांच्या “ललकारी” या कविता संग्रहात समाविष्ट आहेत, त्यामुळेच साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज साहित्यिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. उपरोक्त प्राप्त पुरस्कार आपल्या लेखणीला अधिक बळ देईल अशा भावना शाहीर शाहिद खेरटकर यांनी व्यक्त केल्या. त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











