गॅस सिलेंडर वाटपात शहरी-ग्रामीण भेदभाव नको : शौकतभाई मुकादम
चिपळूण : सध्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर ग्राहकांना गॅस सिलेंडरचे वाटप करताना शहरी व ग्रामीण भागामध्ये भेदभाव केला जाऊ नये, अशी ठाम मागणी पंचायत समितीचे माजी सभापती शौकत भाई मुकादम यांनी केली आहे.
केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार शहरांमध्ये ग्राहकांना दर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे, तर ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनी सिलेंडर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना शौकत भाई मुकादम म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांनाही शहरांप्रमाणेच रोजच्या स्वयंपाकासाठी गॅसची गरज असते. शहरातील नागरिकांना 25 दिवसांनी सिलेंडर देऊन ग्रामीण भागातील लोकांना 45 दिवसांची प्रतीक्षा करायला लावणे हे अन्यायकारक आहे. ग्रामीण भागातील नागरिक दिवसातून एकदाच जेवतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, गॅस सिलेंडर वाटपाच्या धोरणामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे लोकांमध्ये भेदभाव निर्माण करणारे निर्णय घेणे टाळले पाहिजे. सरकारने सर्व नागरिकांना समान न्याय देत शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांनाही दर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे.
सिलेंडर टंचाईची समस्या लक्षात घेऊनही सरकारने योग्य नियोजन करावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणीही श्री.मुकादम यांनी यावेळी केली.














