चिपळुणात ईव्हीएमची बोंबाबोंब
40-45 ठिकाणी मशीनमध्ये बिघाड, मतदारांचा संताप
चिपळूण : तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणांसाठी आज शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली असली, तरी चिपळूण तालुक्यातील 40-45 ठिकाणी मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, काही ठिकाणी मतदार मतदान न करताच माघारी फिरल्याचे निराशाजनक चित्र पाहायला मिळाले. या प्रकारावर आमदार शेखर निकम यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल चार ते पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. संतप्त मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्रातून माघार घेतली. यामुळे माघारी फिरलेले मतदार पुन्हा मतदानासाठी येतील का, असा गंभीर व चिंताजनक प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील विविध भागांत ईव्हीएम बिघाडाच्या घटना समोर आल्या आहेत. मालघर येथे बोटाची शाही आपोआप पुसली जात असल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. शिरगावमध्ये सकाळी जवळपास एक तास दोन मशीन बंद अवस्थेत होत्या. सावर्डे कॉलनीत सकाळी 9 वाजता मशीन बंद पडली होती. याशिवाय पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते, दोणवली आदी ठिकाणी देखील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. खेर्डी येथे बंद पडलेली मशीन नंतर सुरू करण्यात आली, मात्र तोपर्यंत मतदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
खेर्डी, पेढांबे, पिंपळी, सती–चिंचघरी, कळवंडे, कुडप, मालघर कोंढे, शिरगाव आदी अनेक गावांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याने निवडणूक यंत्रणेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सकाळच्या टप्प्यात काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती, मात्र मशीन बंद पडल्याने ही गर्दी संतापात बदलत असल्याचे चित्र होते.
दरम्यान, या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे त्या सर्व ठिकाणी तत्काळ जादा ईव्हीएम मशीन पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जवळपास 50 अतिरिक्त ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, भविष्यातील बिघाड टाळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जादा मशीन सज्ज ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर हजर राहणाऱ्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदानाची वेळ वाढविण्यात येईल, असेही लिगाडे यांनी सांगितले. मात्र, सकाळीच मतदान न करता माघारी फिरलेल्या मतदारांचे काय, असा सवाल नागरिक आणि उमेदवारांकडून उपस्थित केला जात असून ईव्हीएम बिघाडाचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.











