घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत द्या – भरत लब्धे
आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन
चिपळूण ः घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद शासनाने केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 18500 घरकुल लाभार्थी असून त्यांना शासन निर्णयानुसार वाळू उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भरत लब्धे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भरत लब्धे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनुसार, यापुर्वी ७ ऑगस्ट २०२५ रोजी लेखी निवेदन दिले होते. मात्र आजतागायत जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना घर बांधकाम सुरू करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरकूल लाभार्थी ग्रामपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारत आहेत.
वाळू लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास अडीच महिने उलटून गेले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची यांची या संदर्भात भेट घेतली असता, ८ दिवसात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले होते. ७० दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी ठोस कार्यवाही झालेली नाही.
याशिवाय गेल्या महिनाभरात खनिकर्म अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला असता कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. परिणामी घरकुल लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी निर्माण होत आहे. येत्या ८ दिवसात जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. अन्यथा प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लब्धे यांनी दिला आहे.











