संविधानाची शपथ घेऊनही द्वेषपूर्ण वक्तव्ये;
माजी आमदार रमेशभाई कदम यांची तीव्र प्रतिक्रियाचिपळूण : संविधानाची शपथ घेऊन निवडून आलेल्या काही आमदारांकडून समाजात तेढ, द्वेष आणि धार्मिक विभाजन पसरविणारी वक्तव्ये होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेशभाई कदम यांनी आज तीव्र प्रतिक्रिया नोंदवत या प्रवृत्तीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
रमेशभाई कदम म्हणाले, “नितेश राणे, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर आणि मेधा कुलकर्णी यांसारख्या आमदारांकडून मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समाजांविषयी सतत द्वेषपूर्ण विधानं होत आहेत. ही विधानं केवळ समाजात फूट पाडणारी नसून, त्यांनी घेतलेल्या संविधानिक शपथेलाही तिलांजली देणारी आहेत.” ते पुढे म्हणाले की, “देशाच्या एकात्मतेचा पाया समानता, बंधुता आणि धार्मिक सहिष्णुता या मूल्यांवर उभा आहे. संविधानाची शपथ घेणाऱ्यांनीच त्याचं उल्लंघन करणं ही लोकशाहीसाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे. अशा लोकप्रतिनिधींवर निवडणूक आयोग आणि शासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी.”
कदम यांनी माध्यमांमार्फत नागरिकांनाही आवाहन केले की, “धर्माच्या नावावर द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका. सौहार्द, एकता आणि बंधुता टिकवणे हेच खरे राष्ट्रसेवेचे कार्य आहे.”














