प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळणे ही बुरसटलेली मानसिकता : राजूभाई जाधव
गिरीश महाजन यांचा आंबेडकरी अनुयायांकडून तीव्र निषेध
वनरक्षक माधवी जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
रत्नागिरी: “प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधानाचा उत्सव आहे. अशा दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळणे ही बुरसटलेली व संविधानविरोधी मानसिकता असून, हा प्रकार आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही,” असा तीव्र संताप रिपब्लिकन चळवळीतील नेते व सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव यांनी व्यक्त केला आहे.
26 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाषणादरम्यान त्यांनी विविध महापुरुषांचा उल्लेख केला; मात्र भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वनरक्षक माधवी जाधव यांनी भर कार्यक्रमातच आक्षेप नोंदवत मंत्री महाजन यांना जाब विचारला. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला.
या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून, आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची भावना आहे. यावर पुढे बोलताना राजूभाई जाधव म्हणाले, “बाबासाहेबांशिवाय संविधान नाही आणि संविधानाशिवाय प्रजासत्ताक दिन नाही. बाबासाहेबांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्याचा हा प्रकार म्हणजे त्यांच्या विचारांना पुसण्याचा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले की,
“वनरक्षक माधवी जाधव यांनी दाखवलेले धैर्य हे प्रत्येक संविधाननिष्ठ नागरिकासाठी अभिमानास्पद आहे. अन्याय पाहून गप्प बसण्याऐवजी त्यांनी प्रश्न विचारला, हीच खरी लोकशाही आहे. शासनाने अशा अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची न करता त्यांचा सन्मान केला पाहिजे.”
दरम्यान, या घटनेनंतर नाशिकसह राज्यातील विविध भागांतून मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर टीका होत असून, आंबेडकरी संघटनांनी जाहीर निषेध नोंदवला आहे.











