नव्या जनआरोग्य योजनेतून हृदयविकाराला वगळल्याने रुग्णांवर अन्याय : शौकत मुकादम
चिपळूण : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे नामकरण करून त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र या बदलांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक उपचार पद्धत वगळण्यात आल्यामुळे संबंधित रुग्ण व जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. तरी हृदयविकाराला पुन्हा वरील योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, हृदयविकारामुळे अचानक मृत्यू होणाऱ्यांची यांची संख्या वाढत आहे. तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण पूर्णपणे कळू शकले नाही. तेव्हा हा रोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे व हृदयविकाराच्या झटक्यावर उपचार घेणे हे सर्वसामान्य रुग्णांना परवडू शकत नाही आणि म्हणून त्याच्यावर उपचार घेण्यासाठी शासनाची मदत घ्यावी लागते. वरील रोगावर उपचार करणे हे शासनाने योजनेतून काढणे म्हणजे मूर्खपणाचा बाजार आहे. तरी या योजनेचा फेरविचार होऊन हृदयविकार रोग, मूतखडा, डोळ्यांचे आजार असे काही महागडे उपचार आहेत, त्याचा वरील योजनेमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. एखादी योजना उपचाराची आखल्यानंतर त्यामध्ये गोरगरीब रुग्णांना फायदा होत नसेल तर त्याचा काय उपयोग? ही सर्व शोबाजी बंद करून मुळ आजार जे आहेत त्याच्यावर योजनेमार्फत उपचार झाले पाहिजेत अशीही मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे.












