मोरगिरीच्या शेतकऱ्यांनी धरली सेंद्रिय शेतीची कास
पोलादपूर : जलसंधारणाच्या कामास गती मिळण्यासाठी पाणी व राज्य सरकारच्या कृषी विभागाने यावर्षीपासून कोकण विभागात देखील ‘फार्मर कप’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावाने गावात धडक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. रासायनिक शेतीला फाटा देत विषमुक्त शेती पिकवण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर टी-शर्ट आणि टोप्यांचे अनावरण गावाच्या प्रवेशद्वारावरच करण्यात आले. फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मोरगिरी गावाने स्पर्धेसाठी मुसंडी मारली आहे. गुरुवारी मोरगिरी गावातील रामर्पण शेतकरी गटाच्या टीशर्ट व टोपीचे अनावरण सरपंच वैदही पवार तसेच माजी सरपंच नथुराम पवार, गोपाळ पवार, माजी उप सरपंच बारकु शिंदे, शाखा प्रमुख मनोहर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर संपन्न झाले. पाणी फाऊंडेशन, उमेद आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आयोजित फार्मर कप स्पर्धा अख्या महाराष्ट्र भर चालू झाली आहे. त्यामध्ये सेंद्रिय शेती करून नाचणी, भात आणि वेलवर्गीय भाजीपाला या पिकांची पेरणी पूर्व मशागत करण्याची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी फडतरे, उप कृषी अधिकारी गुंड, ‘आत्मा’चे पाटील , पाणी फाऊंडेशनच्या पल्लवी शिंदे आणि सहायक कृषी अधिकारी खारतोडे उपस्थित होते.
यावेळी गटातील सर्व सदस्य शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पुढील काळात विषमुक्त सेंद्रिय शेती करून सकस धन्य पिकाविण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला. येथील शेतकरी गटाने रासायनिक शेतीला फाटा देत गट शेतीद्वारे विषमुक्त शेतीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. यासाठी गावामध्ये दशपर्णी अर्क , गौकृपा बनवून वापर चालू करून विद्यापीठ शिफारशी नुसार भात पिक तंत्रज्ञान वापर करून स्पर्धेत सहभागी होत आहोत. शेतकरी वर्ग खुश होऊन कामकाज करत आहे. सध्या मोरगिरी मध्ये फार्मर कप स्पर्धेसाठी मोठे उत्साहाचे वातावरण आहे.












