WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कोकणातील बळीराजा चिंतेत


कोकणातील बळीराजा चिंतेत

पावसाने दडी मारल्याने पेरणी धोक्यात

चिपळूण : कोकणात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे पंचक्रोशीसह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने अचानक दडी मारल्याने नुकतीच केलेली भात पेरणी धोक्यात आली असून बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

कोकणातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाबरोबर शेतकरी भात पेरणीच्या कामाला सुरुवात करतात. यंदाही सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली तर असंख्य शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहेत. पेरणी केल्यानंतर शेतात कोंबही उगवू लागले; मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, “पेरणी केलेल्या शेतात उगवलेले कोंब आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. वेळेत पाऊस न पडल्यास संपूर्ण पेरणी वाया जाण्याची भीती आहे.” कोकणात पाऊस येण्याची चाहूल देणारा ‘पावशा’ पक्षीही यंदा सतत आवाज देत होता; मात्र त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

शेतकऱ्यांसमोर केवळ पावसाचेच संकट नाही. उगवलेल्या कोंबांवर खेकड्यांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर रानडुक्कर, गवे आणि इतर रानटी जनावरांकडूनही भातशेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. अशा परिस्थितीत पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला धोका अधिक गंभीर ठरत आहे.
सावर्डे परिसरातील शेतकरी सांगतात की, “शेती हा आमचा मुख्य उदरनिर्वाहाचा आधार आहे. पेरणी फुकट गेली तर वर्षभराचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न आहे.” त्यामुळे अनेक शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

दरम्यान, पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास संबंधित भागात “सुका दुष्काळ” जाहीर करण्याचाही विचार शासनाने करावा, अशी मागणी केली आहे.

कोकणातील शेती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनमान हे मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असल्याने पुढील काही दिवसांत होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे. “बळीराजा जगला तरच देश जगेल,” अशी भावना व्यक्त करत सावर्डे पंचक्रोशीतील शेतकरी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. पावसाची प्रतीक्षा आणि भवितव्याची चिंता यामध्ये सध्या कोकणातील बळीराजा दिवस काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!